संस्मरणीय आठवणी…
बंबात तापलेल्या पाण्याची अंघोळ न्हाणीतली असायची.
लाईफबाॅयशिवाय दुसरी कंपनी माहीती नसायची.
ok,501 साबणाची वडी कपड्यावर घासायची…
Moti साबणाचं कौतुक फक्त दिवाळीला असायचं.
शाम्पू कुठला लावताय राव, निरम्यानचं डोकं धुवायचं…
दिवाळीच्या एका ड्रेसवर वर्षभर मिरवायचं…
थोरल्याचं कापडं धाकट्यानं झिजेपर्यंत वापरायचं…
चहा चपातीची न्याहरी, उप्पीट,पोहे कौतुकाने असायचे,
पार्ले बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार नसायचे…
गोल पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं…
खर्डा ,भाकरी,झुणका पंचपक्वानासारखं लागायचं.
गोट्या,विटीदांडू,लपाछपी……..
कधी कधी पत्त्यांचाही खेळ रंगायचा…
काचाकवड्या,जिबली नाहीतर…..
भातुकलीचा डाव मांडायचा…
अधून मधून चिंचा,पेरू,आंब्याची झाड शोधायचं…
नाहीतर जिभेला रंग चढवत गारेगार चोखायचं…
गणगाटाची बैलगाडी,त्याला त्याचाच बैल जुंपायचा…
शेंगा चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा…
पानं चेचून केलेली मेंहदी हातावर खुलायची…
बाभळीच्या शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची…
मनोरंजनासाठी असायची ब्लॅक अॅन्ड व्हाईट टि.व्ही.
शनिवारी हिंदी आणि रविवारी मराठी मुव्ही…
रामायण,महाभारतं शक्तीमानसाठी रविवारची वाट बघायची…
चित्रहार,रंगोली,छायागीत यातून सलमान,माधूरी भेटायची…..
शाळेला* तर नियमित जायचं
वायरीचं दप्तर पाठीवर असायचं…
उरलेल्या पानांची वही बायडिंग करायची…
निम्म्या किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची…
घासातला घास शेअर करत डबे सगळ्यांच संपवायचे…
बाॅटल कुठली राव………..
टाकीच्या नळाला तोंड लावून पाणि प्यायचं…
जमेल तेवढं करत होतो, टेन्शन काय नसायचं…
कारण, नुसतं पास झालो तरी आई-बाप खूष असायचं…
पावसाळा आला की पोत्याची गुंची करायची…
चिखलातनं वाट काढताना स्लिपर त्यात रूतायची…
एकमेकांच हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो…
रिक्षा,स्कूल बस नसली तरी घरी व्यवस्थित पोहचायचो.
दिवसभर हुंदडून पेंगत पेंगत जेवायचं
एकाच अंथरूनावर ओळीनं सगळ्यांनी निजायचं…
वाकळंतल्या ऊबीत झोप मस्त लागायची…
दिवसभराची मस्ती रात्री स्वप्नात दिसायची………..
दिवस पुन्हा उजडायचा नवी मजामस्ती घेऊन…
रात्रीच्या अंधाराला तिथेच मा गे ठेवून…